चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवात परिसंवादाचे आयोजन .!

मराठी भाषेचा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे - डॉ ज्ञानेश हटवार

चंद्रपूर  (वि.प्र.) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर आणि जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ हा कार्यक्रम  २७ - २८ फेब्रुवारी २०२६ ला डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात "मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने" या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात मार्गदर्शन करताना "मराठी भाषा ही हृदयाची भाषा असून ती वैभवसंपन्न, समृद्ध अशी आहे. तिचा स्वाभिमान आपण बाळगलाच पाहिजे," असे मार्गदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ हा कार्यक्रम "मराठी भाषा गौरव दिनाच्या" निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजिन करण्यात आले. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ विद्याधर बन्सोड, साहित्यिक तथा सदस्य, जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर, प्रमुख अतिथी प्रा सदानंद बोरकर, सदस्य, जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर, तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ ज्ञानेश हटवार, डॉ राज मुसने, डॉ, राम वासेकर, प्रा. श्याम हेडाऊ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी हा उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत, ही आनंददायी बाब आहे . मराठी भाषेची दखल जागतिक स्तरावर घेतली जाईल. त्या संधीचे आपण सोने केले पाहिजे व आपली प्रगती साधली पाहिजे. बोली भाषेचे संवर्धन केले पाहिजे. पण त्यासोबतच तिच्यापुढे फार मोठी आव्हानेही आहेत. त्या सर्व आव्हानांना आपण सामोरे जाऊन तिचे संवर्धन केले पाहिजे. मराठीचे संवर्धन करण्यासाठी मराठी शाळा वाचवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वच वक्त्यांनी केले. मराठी भाषा हा आपला प्राण आहे, आपण व्यवहारात मराठीचाच वापर केला पाहिजे, असे अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ विद्याधर बन्सोड यांनी केले. सर्वच व्यक्तींनी आपले अभ्यासपूर्ण, उत्तम मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ योगीराज नगराळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी केले. कार्यक्रमाला वि सा संघ नागपूर चे अध्यक्ष प्रदीप दाते, प्रा. दिलीप अलोणे, चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्याम मोहरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, लक्ष्मण खोब्रागडे, मोहित शेंडे, महेश कोलावार तसेच कवी, साहित्यिक, ग्रंथालय पदाधिकारी , कर्मचारी व मराठी प्रेमी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".