ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार .!
चंद्रपूर (वि .प्र.) : शेतकरी, कष्टकरी तसेच जात-पात, धर्म न पाहता मी कायम गरिबांसाठी लढलो आहे. चेक ठाणेवासना गावाच्या विकासासाठी 2515 तसेच खनिज विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. पाणंद रस्त्याची कामे पूर्णत्वास नेली. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. या गावाच्या विकासासाठी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असून चेक ठाणेवासना गावाचा विकास हेच माझे ध्येय असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘बल्लारपूर मतदारसंघात मागील पाच वर्षात 5 हजार घरकुले आणली. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी, वनपट्टे, घरपट्टे, रोजगार, उत्तम आरोग्य सेवा, तक्रार निवारण सभा, ग्रामीण रुग्णालये, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू ऑपरेशन आदींच्या माध्यमातून गरीब कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलो आहे, असेही ते म्हणाले.
ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘चेक ठाणेवासना गावातील नागरिकांनी मागील तिन्ही विधानसभेत मतरुपी प्रेम व्यक्त केले. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निधी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि रेतीघाटाने खराब झालेला रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ करत बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षांत उमा व अंधारी नदीवर बंधारे बांधून शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.’
काँग्रेसने विकास रोखला :
‘काँग्रेस सत्तेत असताना राजुरा, ब्रह्मपुरी आणि वरोरा मतदारसंघात एकही विकास कामे केलेली नाही. 55 वर्षे देशात तर 50 वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार होते. मात्र, देशासह राज्याचा विकास होऊ शकला नाही. काँग्रेस नेहमीच विकासाच्या बाबतीत टीका करीत आली आहे. सुपीक डोक्यातून नापीक कल्पना काँग्रेसवाल्यांना सुचत असतात. व्हाट्सअप वर कमेंट करून नव्हे तर विकासकामे करून मते मिळवावी लागतात,’ असेही ते म्हणाले.
आपलं पाप लपवण्यासाठी काँग्रेसचा खोटा डाव .!
ना.सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात; काँग्रेसकडूनच संविधानाची पायमल्ली .!
काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.
एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी :
काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला.
गरिबी नव्हे गरीब हटले :
काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.