गोंडवाना गोटूलसाठी वेकोलीकडून पुनर्वसन क्षेत्रात जागा उपलब्ध .!
बल्लारपुर (का.प्र.) : इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके हे पराक्रमाचे प्रतीक असून, त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. गरीब परिस्थितीत वाढलेल्या क्रांतिविरांने भारत माता की जयचा जयघोष करत अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांच्या शौर्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांना पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे बलिदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राष्ट्रीय क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन तथा पारंपारिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, महामंत्री शुभम गेडाम, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, सुरज पेद्दूलवार, रामपाल सिंग, पुरुषोत्तम सहारे, कृष्णाताई गेडाम, जिवनकला मांडवकर, विक्की मेश्राम आदींची उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज अतिशय सात्विक, प्रामाणिक आणि कष्ट करणारा पराक्रमी समाज आहे. नवीन मसाळा, ऊर्जानगर येथे गोंडवाना गोटूल आदिवासी प्रार्थनास्थळासाठी जागा मिळावी यासाठी येथील आदिवासी बांधवांची मागणी होती. याकरिता आदिवासी बांधवांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या मागणीला यश आले असून, वेकोलीच्या माध्यमातून पुनर्वसन क्षेत्रात प्रार्थनास्थळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आदिवासी समाजाने मोठ्या संघर्षानंतर विजय मिळविला आहे.
137 कोटींच्या खर्चाने उभारणार वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम :
चंद्रपूर जिल्ह्यात वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. नवीन चंद्रपूर म्हाडाच्या 16 एकर परिसरात साडेचार हजार क्षमतेचे हे स्टेडियम 137 कोटी रुपये खर्चून उभारले जाणार आहे. स्टेडियम उभारताना मनात एकच भाव होता, वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध एल्गार पुकारून आदिवासी समाजासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे, यासाठी हे स्टेडियम उभारण्यात येत आहे.
गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र आणि एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राची स्थापना :
विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण सुविधा वाढवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र 8.5 एकरमध्ये सुरू करण्यात येत आहे. यात कोणत्याही जाती-धर्माच्या तरुणांना शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात असून, विशेषतः आदिवासी भगिनींसाठी कौशल्य विकासाचे शिक्षण उपलब्ध होणार आहेत. आदिवासी विद्यार्थिनींना उत्तम शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.
मिशन शौर्यच्या माध्यमातून आदिवासी तरुणांचा पराक्रम :
आदिवासी तरुणांना योग्य संधी दिल्यास ते त्याचे सोने करतात, याचा प्रत्यय मिशन शौर्य मोहिमेतून आला. या मोहिमेअंतर्गत 17-18 वर्षांच्या तरुण-तरुणींनी अवघ्या 8 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवला.
शबरी आवास योजना शहरी भागात लागू :
आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी शासन सातत्याने निर्णय घेतले. याच अंतर्गत, शबरी आवास योजना पूर्वी केवळ ग्रामीण भागासाठी लागू होती, मात्र 11 जानेवारी 2024 पासून ही योजना शहरी भागातही लागू करण्याचा निर्णय घेतला.
शिक्षक, शिक्षण आणि राष्ट्रहितासाठी शिक्षक परिषद दृढपणे उभी राहणार - सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम .!
बल्लारपुर : समाजाच्या सर्वच स्तरांवर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या हक्कांची जपणूक करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव केला. शिक्षकहित, शिक्षणहित आणि राष्ट्रहित या त्रिसूत्रीवर कार्य करणारी ही परिषद शिक्षकांच्या हक्कांसाठी कायम दृढपणे उभी राहील, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार नागोजी गाणार, सरिताताई सोनकुसरे, डॉ.मंगेश गुलवाडे,डॉ. कल्पना गुलवाडे, नम्रताताई ठेमस्कर, पूजाताई चौधरी, संध्याताई गीरडकर, विवेक आंबेकर, विजयालक्ष्मी पोरेड्डीवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, स्त्री ही सृजन, सामर्थ्य आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. तिच्या आरोग्याची व सन्मानाची काळजी घेणे, हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची सार्थकता आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात सक्षमतेने पुढे जात आहेत. विशेषतः आर्थिक व्यवस्थापनात त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महिलांची भूमिका मोठी असून, त्या काटकसर करून आपल्या उत्पन्नाच्या सुमारे २६ टक्के रक्कम शिल्लक ठेवतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरत आहे.
ते पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कॉन्व्हेंट शाळांतील शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. यासंदर्भात कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात शिक्षकांच्या वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सामाजिक उपक्रम शिक्षक परिषदेने हाती घेतला. या स्तुत्य उपक्रमासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कौतुक केले. कार्यक्रमात डॉ. कल्पनाताई गुलवाडे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक उपयुक्त माहिती उपस्थितांसमोर मांडली.