विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सकारात्मक पाठपुरावा .. संगणक परिचालकांचे मानधन, वेतन व भविष्यातील सुरक्षेचा मुद्दा मांडला .!
बल्लारपुर (का.प्र .) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपले सरकार सेवा केंद्रांमधून सातत्याने सेवा देणाऱ्या ग्रामीण भागातील संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी संगणक परिचालकांचे मानधन, वेतन व त्यांच्या भविष्यातील सुरक्षेचा मुद्दा मांडून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सकारात्मक पाठपुरावा केला.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने मिळाव्यात या उद्देशाने मागील १५ वर्षांपासून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ परिचालक ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७.५ कोटी ग्रामीण जनतेला विविध सेवा मिळाल्या आहेत. मात्र या केंद्रांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज, शुक्रवार, दि. १८ जुलैला औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले की, शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत संगणक परिचालकांचे योगदान मोलाचे आहे. प्रधानमंत्री घरकुल योजना, शेतकरी कर्जमाफी, विविध शासकीय दाखले अनेक सेवांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. मात्र त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. त्यातही अनेकवेळा सहा महिन्यांपर्यंत विलंब होतो. शासनाने या प्रश्नाकडे सहानुभूतीने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यासाठी वेळ लागत असल्यास प्रकल्पासाठी ३३६ कोटी रुपयांची वेगळी तरतूद करून रोजगार सेवकांप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर मानधन देण्यात यावे,असेही आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात नमूद केले. संगणक परिचालकांचा प्रश्न सकारात्मक विचारात घेऊन लवकरच योग्य तो निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
.....................
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा! .!
अरबिंदो कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधीमंडळात ठाम पाठपुरावा .. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश .. विनंती अर्ज विधिमंडळात मान्य; शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मिळाली अधिकृत दखल .!
बल्लारपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्कांसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा ठाम पाठपुरावा केला आहे.अरबिंदो अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी विधिमंडळात अधिकृतपणे आवाज उठवला आहे.स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळावा, तसेच त्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी अधिकृत विनंती अर्ज सभागृहात सादर केला. सभापती महोदयांनी या विनंती अर्जाची गांभीर्याने दखल घेत सभागृहात मंजुरी दिली आहे.
हा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी विधिमंडळाच्या विनंती अर्ज समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या दीर्घकालीन मागण्या आता अधिकृत स्वरूपात चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या ठाम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांना बळकटी मिळाली असून प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण झाला आहे. भूसंपादन, रस्ते सुशोभीकरण आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आता ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.
स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना अधिकृत मार्ग मिळवून देणारे लोककल्याणाचे हे ठोस उदाहरण असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. आ.सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीप्रमाणे संसदीय आयुधांचा वापर करत विनंती अर्ज मान्य करुन घेतला. यामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार आहे.
